अभिनेता रितेश देशमुख म्हणतो कि बाप्पा आपल्यासारखा नसतो

आपण आपल्या घराच्या देव्हाऱ्यात सकाळी देवदर्शन घेतो. रस्त्यात आपल्याला मंदिर दिसले की आपले हात आपसूकच श्रद्धेने जोडले जातात. हे वर्षभर नित्यनेमाने चालू असतेच .

मग आपणच अचानक एखाद्या विशिष्ट मंदिरात किंवा मंडळात गणपती पावतो असे मानतो आणि  एक प्रकारे आपल्या घरातील देव्हाऱ्यात असलेल्या देवाच्या मूर्तीवर एकप्रकारे आपला अविश्वास दाखवतो. त्यामुळे आपण भक्तीच्या नावाखाली काय करत आहोत  याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे असे मला वाटते.

म्हणजे भक्तीच्या नावाखाली आपण जे जे करतो त्याचं परखड परीक्षण करुया.

नवसाचेच घ्या. खरंतर नवस म्हणजे एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर अतृप्त मन घेऊन आपण देवाकडे जातो आणि  ती इच्छा पूर्ण कर म्हणून मागणे करतो, म्हणजे हव्यासापोटी देवाकडे जातो.

ते पण कसे ? तर सौदयाच्या स्वरूपात

देवाने ' जर ' इच्छा पूर्ण केली  तर मी  हजार नारळांचा, सोन्याच्या विटेचा नवस पूर्ण करेन. म्हणजे नाही इच्छा पूर्ण झाली तर मग नाही काही देणार .बघितले  तर हि सौदेबाजी आहे. म्हणजे आपल्याला वाटते की देवाला अमुक लालच दिली की तो काम करेल. ह्याला आपण भक्ती किंवा श्रद्धा म्हणू शकतो का ? देवाला काय वाटत असेल आपल्याविषयी ?

खरे तर, आपल्याला देवाचे खरे स्वरूपच कळाले नाही असे म्हणता येईल.

आपल्या नावाचा चारी बाजूने जयघोष ऐकल्यावर आपला अहंकार सुखावतो आणि आपण खुश होतो. तसेचआपल्याला वाटते की देवाचे नाव वारंवार घेतल्याने देव खुश होईल.

एखाद्याचे काम असल्यावर त्या व्यक्तीने आपल्याकडे येवून त्या कामासाठी मनधरणी करावी अशी अपेक्षा ठेवतो आपण, तसेच देवाकडे मंदिरात गेलो तरच तो कृपादृष्टी ठेवेल असे आपल्याला वाटते. जसे माणसाला काही लाच दिली किंवा प्रलोभन दाखवले तर तो काम लवकर आणि हमखास करतो, तसेच आपण देवाला नवस दाखवण्याची शक्कल काढली आहे.
म्हणजे आपला अहंकार आणि हाव ज्या गोष्टींने सुखावले जातात , त्याच गोष्टींनी आपण देवास खुश करण्यास निघालो आहोत आणि तेच  देवाच्या भक्तीचे प्रकार आपण बनवलेत.
वारंवार नाव घेणे,नवस देणे, हे सर्व तेच प्रकार आहेत. पण हे देवाला हे हवंय का ?

म्हणजे आपल्यामध्ये जे अवगुण आहेत त्यानुसार आपण देवाच्या भक्तीचे मापदंड ठेवलेत.

म्हणून अभिनेता रितेश देशमुख जे सांगत आहेत ते खरेच आहे.

" Thank God, बाप्पा आपल्यासारखा  नसतो"

देवाकडे  आपण का जातो, याचे देखील आत्मपरीक्षण करूया.

आपले जे चांगले चालू आहे, ते बिघडू नये या भीतीने किंवा ते तसेच राहावे वा वृद्धिंगत व्हावे या लालसेनेच बरेचजण देवाची भक्ती करत आहेत. म्हणजे लालसा आणि भीती या दोन भावना त्यामागे आहेत. काही अतिहुशार लोकांनी या दोन भावना ओळखत श्रद्धेच्या नावाखाली बाजार मांडला आहे. मग त्यातून नवसाला पावणारे अथवा जागृत देवस्थान हे प्रकार आले आहेत. ही श्रद्धा नव्हे , अंधश्रद्धा आहे. आपल्याच भावनांचे मार्केटींग आहे. सर्वचजण बळी पडत नसतील याला,पण होणारी गर्दी बघता मोठ्या प्रमाणात लोक बळी पडलेत असे मानण्यास हरकत नाही.

मी स्वतः साईबाबांच्या 'श्रद्धा आणि सबुरी' या शिकवणीचा भक्त आहे. माझ्या जीवनात कठीण आणि चांगल्या प्रसंगी मला ही शिकवणच कामी आली आहे. श्रद्धा असणे चांगलेच, मनाला बळ देते ती. श्रद्धेच्या जोरावर असाध्य कामे हातात घेऊन मेहनत घेत सबुरी ठेवली तर असाध्य कामे देखील साधली जातात. जर अशी डोळस श्रद्धा असेल तर ती कल्याणकारीच आहे. श्रद्धा जर आंधळी झाली तर देवस्थानांचाच बाजार भरवला जातो आणि त्याचा श्रद्धा आणि  भक्तीशी काहीही संबंध नसतो.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA